रत्नागिरी:- लांबलेला पाऊस आणि त्यामुळे कापणीला झालेला उशीर त्यामुळे उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे भातखरेदीच्या नोंदणीला शेतकर्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नोंदणीला मुदतवाढ मिळण्याची मागणी शेतकर्यांनी केली होती. त्यानुसार भात खरेदी योजनेंतर्गंत शेतकरी नोंदणीच्या कालावधीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
भात खरेदी योजनेंतर्गंत नोंदणी करण्यासाठी शेतकर्यांना सन 2022-23 या वर्षी पिकपेर्यामध्ये भाताची नोंद असलेल्या सातबारा उतार्याची आवश्यकता आहे. मात्र, अनेक शेतकर्यांनी तशा नोंदी केलेल्या नसल्याने अनेक साताबारा उतार्यांवर यावर्षीच्या पिकपेर्याची नोंदी झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे भात खरेदी योजनेंतर्गंत शेतकरी नोंदणीला शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतामध्ये पिकणारे भात शासनाकडून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकर्यांना शेतामध्ये पिकणार्या भातातून उत्पन्न मिळते. मात्र, अद्यापही भात कापणी सुरू आहे. पीकपेरा नोंदणी असलेला ऑनलाईन सातबारा उतारा मिळण्यामध्ये येत असलेल्या अडथळ्यांमुळे भातविक्रीसाठी नावनोंदणी करण्याला शेतकर्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नावनोंदणीसाठी शासनाकडून देण्यात आलेला कालावधीही अपुरा ठरत आहे. नावनोंदणीच्या कालावधीमध्ये वाढ व्हावी, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात होती. त्याची दखल घेत शासनाने 30 नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ज्या शेतकर्यांना भातविक्री करायची आहे त्या शेतकर्यांना विहित कागदपत्रांसमवेत शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने महिनाअखेरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.