बाजारात हापूसची आवक वाढली; दर घसरले 

रत्नागिरी:- उन्हाच्या कडाक्यामुळे दुसर्‍या टप्प्यातील आंबा वेगाने तयार होत आहे. गेल्या चार दिवसात नवी मुंबईतील फळ बाजारातील हापूसची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. दर पाचशे रुपयांनी घसरले आहेत. सध्या पेटीचा दर 1500 ते 4000 रुपयांपर्यंत आहेत; मात्र संचारबंदीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.

वातावरणातील अनियमिततेमुळे पहिल्या टप्प्यातील हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. मागील पंधरा दिवस आंबाच नसल्यामुळे ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागत होती. गुढी पाडव्यापुर्वी वाशीमध्ये 18 ते 20 हजार पेटी जात होती. पाडव्याला मुहूर्ताच्या दिवशी 34 हजार सर्वाधिक पेटी गेली. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच होती. एप्रिल महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून सरासरी 60 हजार पेटी जाते. त्यामुळे दर वधारले असून चार दिवसांपुर्वी हे दर पाच डझनच्या पेटीला दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत होते.

सध्या दुसर्‍या टप्प्यातील आंबा तयार होण्यास सुरवात झाली आहे. गेल्या तिन दिवसात 30 हजार ते 34 हजार पेटी आंबा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाशीत दाखल होत आहे. उत्पादन कमी असल्यामुळे यंदा एप्रिल महिन्यातील दर विक्रमी होते; मात्र वाढलेली आवक आणि संचारबंदीमुळे ग्राहकांकडून मिळत असलेला अल्प प्रतिसाद याचा परिणाम दरावर झालेला आहे. आठ दिवसात पाचशे रुपयांनी दर खाली आले आहेत. संचारबंदीचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत असून कडक निर्बंधांमुळे वाहतुकीत अडचणी निर्माण होण्याची भिती बागायतदार व्यक्त करत आहेत.