‘बसरा स्टार’ मुक्काम ठरतेय पर्यटन स्थळ

रत्नागिरी:- येथील मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तब्बल पाच वर्षांनंतर हे जहाज काढण्यात येणार आहे. गेली पाच वर्षे तरूण‚ तरूणांच्या रिल्स आणि त्या रिल्स पाहून परजिल्ह्यातून येथे येणाऱ्या पर्यटकांचा बेस्ट स्पॉट बनल्याने येथे स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध झाला. पण आता हे जहाज भंगारात निघणार असल्याने हा बेस्ट स्पॉट व स्थानिकांचा रोजगारही थांबणार आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने दुबईहून मालदीवला जात असताना दि.३ जून २०२० रोजी अरबी समुद्रात भरकटलेले जहाज रत्नागिराच्या मिऱ्या किनारी येउन धडकले आणि आजही तेथा अडकून आहे. सुमारे ३५ कोटींचे हे जहाज दोन कोटींमध्ये भंगारात काढले जाणार आहे. याबाबत एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर सीमाशुल्क, मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. ५०० मेट्रिक टन वजनाचे हे जहाज १५ दिवसांत परवानगी मिळाल्यावर भंगारात काढले जाणार असल्यो सांगितले जात आहे.

या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाजामुळे मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधार्याचे काम रखडले आहे. त्यामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली. त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. पण त्या घडल्या घटनेनंतर आजही त्या जहाजाचे कॅप्टन आणि एक खलाशी अजूनही या परिसरात भाडयाने वास्तव्यास आहेत.

हे जहाज काढण्याबाबत दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला आहे. त्यांनी ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. कन्सल्टंट कंपनीने तसा पत्रव्यवहार सुरू केला आहे. केंद्र शासनाची भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचे मूल्यांकन करणार आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या जहाजाची प्रसिध्दी सोशल मिडीयाया माध्यमातून वेगवेगळ्याप्रकारे करण्यात आलेल्या रिल्सद्वारे सर्वदूर पसरली. रत्नागिरीत हे जहाज असल्याचे पाहून अगदी परजिल्ह्यातील पर्यटकांना देखील त्याला भुरळ पडलेली आहे. रत्नागिरी पर्यटनासाठी येणारे पर्यटकांनी आवर्जून हे जहाज पाहण्यासाठी मिर्या किनाऱ्याकडे पावले वळताना दिसत आहेत. त्याठिकाणी भंगारात जाणारे जहाज रोजगाराला चालना देणारे ठरले आहे.