उल्लेखनिय कामगिरीबद्दल राज्यात रत्नागिरी जिल्ह्याची अभिमानास्पद कामगिरी
रत्नागिरी:- केंद्र शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतस्तरावर यशस्वीपणे राबवल्याबद्दल दिल्लीत प्रजासत्ताक दिनासाठी बोलवण्यात आलेल्या रत्नागिरी पोमेंडी बु.च्या सरपंच ममता अंकुश जोशी यांचा विशेष सन्मान केंद्रीय पंचायतराज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. देशभरातील 555 सरपंचांमधून 11 सरपंचांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सरपंच ममता जोशी यांचा समावेश होता.
केंद्र शासनाच्या योजना राबवताना दहा विविध निकष यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बु.च्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला विशेष निमंत्रित म्हणून केंद्र शासनाने निवड केली होती. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून एका सरपंचाला शासनाच्या खर्चाने दिल्लीला पाठवण्यात आले होते. राज्यातून 34 सरपंच दिल्लीला रवाना झाले होते. देशभरातून 555 सरपंच प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीला उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयामार्फत उपस्थित सरपंचांचे योजना चांगल्या राबवल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यातही 555 सरपंचांमधून 11 सरपंचांचा केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह आणि पंचायती राज राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी विशेष गौरव केला. या 11मध्ये महाराष्ट्रातील दोन सरपंच असून रत्नागिरीमधील ममता जोशी आणि धाराशिवमधील एका सरपंचांचा गौरव करण्यात आला. देशपातळीवर रत्नागिरीची मान उंचावणार्या ममता अंकुश जोशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.