आंजर्ले:– पुण्यातील औंध भागातील १४ पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. येथे समुद्रात पोहण्याचा आंनद घेत असताना सहा पर्यटक बुडाले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह १४ पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले असता असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक पाण्यात बुडाले.
ही घटना किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांच्या निर्दशनास आली. त्यामुळे तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. बुडालेल्या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा यावेळी बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या तीन तरुणांना सध्या दापोली येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
हे तरुण बुडाल्याचं दिसून येताच स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्यांना फक्त तिघांचेच प्राण वाचण्यात यश आलं. इतर तीन पर्यटक तोपर्यंत पाण्यात बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध स्थानिक घेत होते. या घटनेची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध घेण्यात आला. काही वेळाने हे तिघांचेही मृतदेह आढळून आले. दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून, वाचवण्यात आलेल्या तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.