पुढील दोन दिवसात मळभी वातावरणासह पावसाची शक्यता

रत्नागिरी:- पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी भागासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात मळभाची स्थिती कायम होती. पुढील दोन दिवस अशीची स्थिती राहणार असून रविवारनंतर मात्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. आग्नेय दिशेने येणार्‍या बाष्पयुक्त वार्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात आर्द्रतेत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन दिवस दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड व गोव्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बीड, नगर, धाराशिव आणि लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारनंतर मात्र पावसाचे ढग विरळ होण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामान कमी होऊन किनारपट्टी भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस मात्र त्या नंतर धुके पडण्याची शक्यता असून, गारठाही वाढू लागण्याची शक्यता आहे.