रत्नागिरी:- तालुक्यातील पावस नजिकच्या गोळप मुस्लीम मोहल्ला येथे आंब्याच्या बागेत रखवालदार असलेल्या सख्ख्या भावांची सोमवारी मध्यरात्री धारधार हत्यारासह डोक्यावर दगड टाकत अज्ञात इसमांनी हत्या केली. मंगळवारी सकाळी हत्येची घटना उघड झाल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली. आंबा चोरीच्या इराद्याने आलेल्या व्यक्तींनी हत्या केली की नेपाळमधील पूर्ववैमनस्यातून सख्ख्या भावांची हत्या करण्यात याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तर पूर्णगड पोलीस स्थानकात अज्ञात मारेकर्यांविरोधात भा.दं.वि.क. ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
रत्नागिरी-पावस बायपास मार्गावर गोळप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुस्लीम मोहल्ला येथे मुदस्सर मुकादम यांच्या मालकीची आंबा कलमांची बाग आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भक्त बहाद्दूर थापा (वय ६०), ललन बहाद्दूर थापा (वय ५५) (मूळ रा.नेपाळ, सध्या आंबा बाग, गोळप) येथे रखवालदार म्हणून कामाला होते. बागेच्या सड्यावर आंब्याच्या झाडाच्या बुंध्यावर मचान करून हे दोघेही सख्खे भाऊ तेथेच रहात होते. आंबा पीक आल्यानंतर त्याचे संरक्षण करण्यासाठी दोघेही रात्रभर चांगला पहारा देत होते.
मंगळवारी सकाळी मुदस्सर मुकादम यांचा एक कामगार बागेत आला असता त्याला दोघे थापा मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. त्याने याबाबतची माहिती आपल्या मालकांना दिली. त्यानंतर मुदस्सर मुकादम आंबा बागेत दाखल झाले. यावेळी भक्त, ललन थापा हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात आंबा झाडाच्या बुंध्याखाली मृतावस्थेत पडलेले होते. त्यानंतर श्री.मुकादम यांनी या घटनेची माहिती पूर्णगड पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी निलेश माईनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पूर्णगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर धायकर यांच्यासह श्वानपथक, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून भक्त थापा, ललन थापा या दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले.
भक्त थापा, ललन थापा हे गेले सहा महिने मुदस्सर मुकादम यांच्या आंबा बागेत रखालदार म्हणून काम करत होते. सोमवारी मध्यरात्री अज्ञाताने धारधार हत्याराने दोघांवर सपासप वार करून त्यांच्या डोक्यात दगड घालून मृतदेहाचा चेहरा छिन्नविछीन्न केला होता. घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेले दोन दगड आढळून आले. परंतु वार करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार घटनास्थळी आढळून आलेले नाही. या हत्येच्या संशयावरून पोलिसांनी परिसरातील आंबा बागांमध्ये काम करणार्या नेपाळी तरूणांना पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी आंबा बागेत काही चोरांनी आंबा चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दोघा थापा बंधूंनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्याकडील आंबा काढण्याचा गळ हिसकावून घेतला होता व तो दुसर्या दिवशी मालक मुदस्सर यांच्याकडे जमा केला होता. त्यामुळे दोघा थापा बंधूंची हत्या आंबा चोरीच्या प्रकरणातून झाली की नेपाळमधील पूर्ववैमनस्यातून थापा बंधूंचा काटा काढण्यात आला, हे शोधण्याचे आव्हान जिल्हा पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
घटनास्थळाचा परिसर पोलिसांनी सर्च केला असून पोलिसांना परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. तर श्वान पथकही हत्या करणार्यांचा माग काढण्यासाठी आंबा बागेच्या बाहेर गेलेले नाहीत. परिसरातच श्वान घुटमळत राहिल्याने हल्लेखोर नेमके कोणत्या दिशेने पळून गेले याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. तर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील रक्त, मातीचे नमुने ताब्यात घेतले आहेत. एकाच वेळी दोघांची हत्या झाल्याने या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर स्थानिक गुन्हे शाखा स्वतंत्रपणे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.