रत्नागिरी:- पुर परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून पाच नवीन बोटींची खरेदी करण्यात आली आहे. खेड, राजापूर व चिपळूण नगरपालिकेसह रत्नागिरी तहसिल आणि पोलिस प्रशासनाकडे प्रत्येकी एक नौका सुपूर्द करण्यात आली. रत्नागिरीतील नौकेद्वारे भाट्ये खाडीत गुरुवारी (ता. 7) प्रात्यक्षिक घेण्यात आले.
दरवर्षी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. त्याला सामोरे जाताना जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडते. दोन वर्षांपुर्वी तिवरे धरण दुर्घटनेप्रसंगी व्हाईट आर्मीची मदत घ्यावी लागली होती. पुरामध्ये मदत करण्यासाठी काही वर्षांपुर्वी आपत्ती व्यवस्थापन कक्षाने रबरच्या तिन बोटी घेतल्या होत्या. त्या खेड, चिपळूण पालिकेकडे सुपूर्द केल्या. पुराच्यावेळी मदत यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवीन पाच बोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली असून नवीन बोटी रत्नागिरीत दाखल झाल्या आहेत. यामध्ये एकावेळी दहा व्यक्ती बसतील एवढी क्षमता आहे. या बोटीचे इंजिन 30 अश्वशक्तीचे (हॉर्सपॉवर) आहे. यामध्ये आठ लाईफ जॅकेट आणि चार बोये आदी साहित्य ठेवले जाणार आहे. प्राप्त बोटीपैकी खेड, चिपळूण, राजापूर नगरपालिकेला प्रत्येकी एक देण्यात आली आहे. रत्नागिरी तहसिल आणि पोलिस प्रशासन यांनाही प्रत्येकी एक बोट देण्यात आली. पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत रत्नागिरीतील भाट्ये खाडीत डेमो घेण्यात आला. ही बोट एचडीपीई (हळसह वशपीळींू श्रिेूशींहूश्रशपश) बनावटीची आहेत. फायबरमधीलच हा एक प्रकार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. प्रात्यक्षिकावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सुर्यवंशी यांच्यासह सुनिल किर, पोलिस निरीक्षक केळकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक दळवी, श्री. डगळे, श्री. कोळंबेकर, तलाठी श्री. झिटे, मंडळ अधिकारी श्री. सरफरे, अग्निशमन विभागचे अधिकारी उपस्थित होते.
एका बोटीच किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे. बोटी आणण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. सरत्या पावसाळी हंगामात यंदा अतिवृष्टी झाली होती. चांदेराई, हरचिरी, पोमेंडी, सोमेश्वर या परिसरात काजळी नदीचे पाणी भरले होते. या पुराचे पाणी सोमेश्वरकडे जाणार्या रस्त्यावर येते. अशावेळी बोटींची गरज भासते. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.