पाऊस लांबला! धरण क्षेत्रातील पाणीसाठा केवळ २० टक्क्यांवर

रत्नागिरी:- लांबलेला पाऊस आणि उन्हाचा वाढता कडाका यामुळे जिल्ह्यातील तिन मध्यम पाटबंधारे तलावांसह 67 लघू पाटबंधारे प्रकल्पातील पाणी साठा मोठ्याप्रमाणात घटला आहे. एकुण पाणी साठ्याच्या सरासरी 23 टक्के साठा धरण क्षेत्रात शिल्लक आहे. त्याचा परिणाम भविष्यात पाणी टंचाईच्या तिव्रतेवर होणार आहे.

यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू लागला. अधुनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा परिणाम झाला नाही. उन्हाचे चटके सहन करावेच लागत होते. जुनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु होईल असा अंदाज होता; मात्र बिपरजॉय चक्रीवादळानंतर कोकणात वार्‍यांचा वेग मंदावला आणि पाऊसही लांबला. हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानूसार जिल्ह्यात 21 पासून मुसळधार पाऊस पडू शकतो. तोपर्यंत उष्माघाताची लाटा राज्यात कायम राहणार आहे. आतापर्यंत वीस दिवसात जिल्ह्यात सरासरी शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यातील धरणक्षेत्रात पडलेल्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. उष्म्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. त्यामुळे साठाही कमी होत आहे. कोयनेसारख्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पात्र कोरडे झाले आहे. तशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये दिसत आहे. मध्यम प्रकल्पात नातूवाडीमध्ये 6.343 दलघनमीटर, गडनदीमध्ये 55 दलघनमीटर, अर्जुना प्रकल्पात 56 दलघनमीटर, मुचकुुंदीमध्ये 14.66 दलघनमीटर पाणी साठा आहे. नातूवाडीत प्रकल्पात एकुण साठ्याच्या 23 टक्केच पाणी उपलब्ध आहे. प्रकल्पाच्या पाण्यावर नळपाणी योजनांचे स्रोत अवलंबून असतात. धरणातील पाणी कमी होऊ लागले की स्रोत कमी झाल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. सध्या अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हावासीयांना पावसाची प्रतिक्षा असून आठवडाभर आगमन लांबले तर भिषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

चौदा धरणात शुन्य साठा

धरणातील शुन्य पाणी साठा असलेल्या धरणामध्ये चिंचाळी, सुकोंडी, टांगर, तिवरे, तेलेवाडी, केळंबा, हर्देखळे, पन्हाळे, कोंडगे, कशेळी, परुळे, गोपाळवाडी, जुवाटी, कोेंडवाडी यांचा समावेश आहे.