पऱ्याची आळी येथे तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा हल्लेखोरांना अटक

रत्नागिरी:- शहरातील पर्‍याचीआळी येथे नागेश प्रकाश गजबार (वय २७ रा. कुवरबाव ) या तरुणावर धारधार कोयत्याने हल्ला करणार्या तिघांना शहर पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे. आर्थिक व्यावहारातून हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता.

 रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे राहणार्‍या  नागेश गजबार या तरुणाला त्याचे दोन मित्र शुभंम सोळंखी (रा.गवळीवाडा) , महेश शेळके (रा. शांतीनगर),  या दोघांनी फोन करून शहरातील पर्‍याचीआळी येथे बोलावले. परंतु नागेश पर्‍याचीआळी येथे आल्यानंतर त्यातील एकाने त्याच्या डोक्यात लादी घातली.त्यानंतर दुसर्‍या तरुणाने धारदार कोयत्याने नागेशच्या डोक्यावर, हातावर सपासप वार केले. तर अक्षय मानेही त्यांच्या सोबत होता. ते तिघेही  घटनास्थळावरून पळून गेले होते.

स्थानिक नागरिकांनी नागेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. नागेशवर अध्याप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागेशने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी शुभम सोळंखी रा.गवळीवाडा व महेश शेळके रा. शांतीनगर, अक्षय माने या तिेघांविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज भोसले यांच्या नेत्वृवाखालील पथक तिघांचा शोध घेत होते. त्या तिघांनाही पकडण्यात मनोज भोसले यांच्या पथकला यश आले आहे. तिघांना पकडणार्‍या पथकाचे प्रभारी पोलीस निरिक्षक निशा जाधव यांनी अभिनंदन केले आहे.