परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याबाबत अद्याप अधिकृत निर्णय नाही

चिपळूण:- मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी घाटातील वाहतूक सोमवार २७ पासून ते ३ एप्रिलपर्यंत दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, याबाबत रविवारी (२६ मार्च) रात्रीपर्यंत कोणतीच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे घाटातील वाहतूक सुरूच राहणार आहे.

महामार्गावरील ५.४० किलोमीटर लांबीच्या या घाटातील ४.२० किलोमीटर लांबीचे काॅंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे घाटातील या अंतरातील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. उर्वरित १.२० किलोमीटरची लांबी ही उंच डोंगर रांगा व खोल दऱ्या असल्याकारणाने चौपदरीकरणाचे काम करताना अडचणी येत आहेत. याठिकाणी डाव्या बाजूस सुमारे ६०० मीटर लांबीपर्यंत दुहेरी लांबीतील कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेल्या भागावरून वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. तसेच सुमारे ५०० मीटरच्या अंतरात माती काम जवळजवळ पूर्ण करण्यात आले आहे. केवळ १०० मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे. या अंतरात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने तेथे चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत आहे. त्यापैकी तीन टप्प्यांतील खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित चौथ्या टप्प्याचे काम प्रगतीत आहे. हे काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.