निढळेवाडी येथे चारचाकी अपघातात सहाजण जखमी

संगमेश्वर:- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गांवर संगमेश्वर निढळेवाडी येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालकासह इतर पाच प्रवाशी जखमी झाले. या अपघातात तीन मुलांचा समावेश असून सर्व जखमीवर संगमेश्वर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. हा अपघात बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडला.

शौकत बाबा मुल्लाजी मूळ गाव चिखली, सध्या राहणार रत्नागिरी हे त्यांच्या ताब्यातील होंडा सिटी (गाडी नंबर MH05- AJ-5984) ही गाडी घेऊन चिखळी येथून रत्नागिरी येथे जात होते. या गाडीत त्यांच्या बरोबर आफ्रिन मुबीन खलफे (वय 33), हिजान मुबीन खलफे (वय 10 वर्ष), अलमीरा मुबीन खलफे (वय 14 वर्ष) हे सर्व राहणार रत्नागिरी (धनजीनाका), फिजा नजीब खांचे (वय वर्ष 29), आफ्राज खांचे (वय वर्ष 6) (सर्व राहणार शिवाजी नगर, रत्नागिरी) हे प्रवास करत होते.

संगमेश्वर नजीक असलेल्या हॉटेल स्वादच्या पुढे निढळेवाडी येथे आल्यावर गाडी चालक शौकत मुल्लाजी यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अर्धा ते एक फूट उंच असलेल्या रस्त्यावरून गाडी थेट कच्या रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी महामार्गच्या कामासाठी ढीग लावून ठेवलेल्या खडीच्या ढीगाऱ्यांवर कोलांट्या खात पुन्हा मुख्य रस्त्यावर आली. जर खडीचे ढीगारे नसते तर जवळ अंतरावरच नदी असून चालकाला गाडी आवरता आली नसती, तर याहुन अधिक गंभीर दुर्घटना घडली असती. तसेच जीवावरचे जखमेवरच निभावले असेच म्हणावे लागले.

गाडीतील एअर बॅग उघडल्याने देव बलवत्तर म्हणावे लागले. गाडीतील सामान तसेच गाडीचे तुटलेले भाग काही अंतरापर्यंत उडाले होते. या अपघातात चालकासह गाडीतील दोन महिला आणि तीन मुलांना मार लागला असून जखमी सुद्धा झाले आहेत. या सर्वांवर संगमेश्वर येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येऊन अधिक उपचारासाठी नातेवाईकांनी रत्नागिरी येथे हलवण्याचा निर्णय घेतला.