रत्नागिरी:- रत्नागिरीच्या वि. दा. सावरकर नाट्यगृहातील अनेक गैरसोयीनी सध्या रंगमंचावरील कलाकारांची अक्षरशः घुसमट सुरू आहे. नाट्यगृहामध्ये प्रचंड उष्मा जाणवतो. वातानुकूलीत यंत्रणेविना पर्याय नाही. मात्र बसविलेली वातानुकूलीत यंत्रणा कालबाह्य आणि कमी क्षमतेची आहे. नाट्यगृहाची रचनाही वादातीत नाही, ध्वनीयंत्रणेचाही आनंदच आहे. अशा समस्यांनी ग्रासलेल्या नाट्यगृहामुळे नाट्यप्रेमींची घोर निराशा होत आहे.यामुळे कोट्यवधीचा खर्च पाण्याच गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केल्याने पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सावरकर नाट्यगृह हे पालिकेच्या मालकिचे आहे. नाट्यगृहाच्या रंगमंचावर वायूवीजनाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे रंगमंचावरचे कलाकार अक्षरशः घाम गाळून अभिनय करतात. सावंतवाडीतील क्षितिज इव्हेंट्स या संस्थेचे मत्स्यगंधा हे नाटक सुरू होते. पहिले दोन प्रवेश सुरळीत पार पडले. तिसरा प्रवेश मात्र सुरू होण्यात अडचण आली. भीष्माची प्रमुख भूमिका निभावणारे कलावंत बाळ पुराणिक यांना रंगमंचावरच अस्वस्थ वाटू लागले. दुसऱ्या प्रवेशात अखेरच्या भागातच तो जाणवू लागला होता, ते विंगेत गेले, तेव्हा त्यांना तो प्रकर्षाने जाणवू लागला. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करावे लागले. ही आफत पूर्णपणे गैरसोयीनी आली नसली तरी त्रास वाढलाच. सावरकर नाट्यगृह दुर्लक्षित आहे. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी झाला नसेल, तेवढा त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत खर्च झाला आहे. पण तरीही गैरसोयीमध्येच कलाकार काम करत आहेत. नाट्यप्रेमीं नाईलाजाने नाटक पहात आहेत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर म्हणाले, मुख्यतः नाट्यगृहाच्या इंटिरिअरचे ॲकॉस्टिक ऑडिट करणे आवश्यक आहे. तरच ध्वनियंत्रणा सुधारेल. शोशर यंत्राने आवाज ओढून घेतला जातो. तो घुमत नाही वा प्रतिध्वनी येत नाही. नाट्यगृहाची रचनाही वातानुकुलीत यंत्रणेस योग्य नाही. भरपूर उंचीमुळे गारवा येत नाही. उंची कमी करण्याची गरज आहे. राज्यातील १०० नाट्यगृहांची कामं करणाऱे तज्ज्ञ वराडकर यांना बोलवण्याच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही.नाट्यगृहासाठी २० हजाराचे डिझेलच लागले.त्याशिवाय नाट्यगृहाचे भाडे वेगळेच. त्यामुळे सावरकर नाट्यगृह राज्यातील सर्वांत महागडे ठरते.पालिकेच्या उत्पन्नाचे ते साधन नाही अन नफा, ना तोटा उद्देशाने ते चालवायचेय.