नव्या ठेकेदाराची नियुक्ती रखडली; पालकांमधून नाराजी
रत्नागिरी:-नवीन शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून सुरु होणार आहे. मात्र, अजूनही रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना पोषण आहार पुरवठा करणार्या ठेकेदाराची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. मागील नऊ महिने विद्यार्थ्यांना पोषण आहारच मिळालेला नव्हता. पुढील वर्षातही कधी आहार दिला जाणार याबाबत अनिश्चितता आहे. या प्रकारामुळे पालकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकाराकडे स्थानिक मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून वारंवार मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, शाळांमधील सर्व विद्यार्थी पोषण आहारापासून गेले नऊ महिने वंचित होते. कोरोनामुळे मागील दोन शैक्षणिक वर्षात शिकवणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. जून महिन्यात नवीन ठेकेदार निश्चित करुन पोषण आहारासाठी आवश्यक साहित्य त्या-त्या शाळांना पुरवले जाते. यंदा ठेकेदारच निश्चित न केल्यामुळे गोंधळ झाला. शासनाने ऑगस्ट ते फेब्रुवारी 2022 अशा सात महिन्यांचा कोरडा आहार त्यात तांदूळ व धान्यही देणार असल्याचे परिपत्रकाद्वारे घोषित केले. त्यानंतर नऊ महिने झाले तरीही आहार देण्यासंदर्भात कार्यवाही झालेली नाही. तिसर्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर शैक्षणिक कामकाज पुन्हा सुरु करण्यात आले होते. परंतु, आहार वाटप करण्याबाबत शासनाकडून कोणतीच पावले उचलण्यात आली नव्हती.
पोषण आहाराचे धान्य पुरवठा करण्याठी दरवर्षी ठेकेदार नेमला जातो. रत्नागिरीसह सात जिल्ह्यांमध्ये निवड झालेली नाही. उर्वरित सर्व जिल्ह्यांचा पुरवठा सुरळीत झाला. नवीन शैक्षणिक वर्ष पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून सुरु होत आहे. तोपर्यंत तरी आहार पुरवठ्यासाठी ठेकेदार निश्चित केला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.