रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या तिसर्या टप्प्यातील प्रक्रियेची यादी जाहीर झाली आहे. बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करणार्या 399 शिक्षकांपैकी 299 जणांच्या बदल्या झाल्या आहेत. या प्रक्रियेमुळे बहूसंख्य शिक्षक दुर्गम मधून सुगम क्षेत्रातील शाळांमध्ये आले आहेत.
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तिसर्या टप्प्यात बदली अधिकार पात्र ठरलेल्या 1 हजार 473 शिक्षकांना बदलीसाठी शाळा विकल्प ऑनलाईन भरण्यासाठी मुदत दिली गेली होती. त्यापैकी 399 शिक्षकांनी बदलीसाठी विकल्प भरले. अपेक्षित शाळा नसल्यामुळे बहूसंख्य शिक्षकांनी बदली प्रक्रियेतून माघार घेतल्याची चर्चा सुरु आहे. अवघड क्षेत्रातील अनेक शिक्षक सुगम शाळांमध्ये येण्यास उत्सुक असतानाही प्रत्यक्ष बदली प्रक्रियेत आलेल्या शिक्षकांचा टक्का कमी आहे. विकल्प भरलेल्यांपैकी 299 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. शंभर शिक्षकांनी शाळा विकल्पच समान भरल्यामुळे त्यांना संधी मिळालेली नाही, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. बदली करताना सेवा ज्येष्ठता पहिली जाते आणि बदलीसाठी प्राधान्य दिले जाते. शंभर शिक्षक बदली प्रक्रियेतून बाहेर गेले असून पुढील टप्प्यात त्यांना संधी मिळणार नाही.
पुढील टप्प्यासाठी 871 शिक्षक
बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांचा पुढील टप्पा सुरु झाला असून शाळा विकल्प भरण्यासाठी 21 ते 24 जानेवारी मुदत दिली आहे. यामध्ये 871 शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांच्या लॉगीनला रिक्त पदांची यादी टाकण्यात आली आहे. त्या शाळा बदलीसाठी निवडणे बंधनकारक करण्यात आले आहे.