दीड महिन्यात 82 हजार विद्यार्थ्यांची शाळेत हजेरी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही शाळेतील विद्यार्थी उपस्थिती पन्नास टक्केपर्यंतच आहे. 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुुरु करण्यास मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यातील 454 पैकी 408 शाळा सुरू झाल्या असून 82 हजार 69 पैकी 42 हजार विद्यार्थी शाळेत उपस्थित राहात आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचे आदेश नसले तरीही सुमारे एक हजाराहून अधिक शाळांचे वर्ग प्रत्यक्षात सुरु झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधित सापडणार्‍या रुग्णांचे प्रमाण दहा ते वीसच्या मध्ये आहे. आठ दिवसांपुर्वी ते एकपर्यंत आले होते. शासन आदेशानुसार जिल्ह्यातील शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. कोरोनाच्या भीतीमुळे पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नव्हते. पालकांचे ना हरकत पत्र ही बाबत अडचणीची होती; मात्र शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्याचे प्रमाण सर्वात चांगले आहे. शिवाय उपस्थितीही लक्षणीय आहे. शहरातील पालक अद्याप मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. दीड महिन्यात शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले तरी विद्यार्थी उपस्थिती अजूनही घटलेलीच आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता 8 शिक्षक व 2 कर्मचारी कोरोनाबाधित सापडले होते. शिक्षक सापडले तरीही विद्यार्थी संक्रमणाचे प्रमाण शून्यच आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 46 शाळांमध्ये मात्र अद्याप ऑनलाईनच अध्यापन सुरू आहे. त्या शाळा शहरी भागातील आहेत.

दरम्यान, माध्यमिक शाळांबरोबरच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाही सुरु झालेल्या आहेत. प्राथमिक विभागाकडून त्यांना परवानगी मिळालेली नाही. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक आपापल्या जबाबदारीवर या शाळा सुरु करत आहेत; परंतु काही ठिकाणी पट अधिक असल्यामुळे सामाजिक अंतर राखण्याचा प्रश्‍न निर्माण होत असून तेथील मुख्याध्यापक ही गोष्ट गांभिर्याने घेत नसल्याचे पुढे येत आहे. यावरुन शिक्षण विभागाकडे तक्रारी येत आहेत. त्यांचा शहानिशा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तत्काळ पावले उचलली जात आहेत.