रत्नागिरी:- जिल्ह्यातील गावागोवी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुगणनेची मोहिम युध्दपातळीवर राबवली जात आहे. पशुगणना मोहिमेस केंद्र शासनाने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 694 गावांपैकी आतापर्यंत 604 गावातील पशुगणना पुर्ण झाली आहे. जिल्ह्यात पशुगणनेचे 50 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येत असते. यावर्षी 25 नोव्हेंबरपासून रत्नागिरी जिल्ह्यात पशुगणनेस सुरूवात झाली आहे. राज्य शासनाने दि. 28 फेब्रुवारीपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पशुसंवर्धन विभागासमोर ठेवले होते. मात्र, जवळपास सर्वच तालुक्यातील काही गावे दुर्गम व डोंगरी भागात आहेत. त्यामुळे गणनेसाठी गेलेल्या प्रगणकांना नेटवर्कच्या अडचणी येत होत्या.
पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या 16 प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण 150 प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत ही गणना करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 हजार 694 गावे आहेत. त्यापैकी 604 गावात पशुगणनेचे काम पूर्ण झाले आहे. 127 गावांमध्ये अजूनही या पशुगणनेला प्रारंभ झालेला नाही. उर्वरित गावांमध्ये मात्र पशुगणना सुरू आहे. आतापर्यंत पशुधनची संख्या 1 लाख 38 हजार 304 तर पशुंची संख्या 2 लाख 86 हजार इतकी आहे.
पशुगणनेचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने 31 मार्चपर्यंत पशुगणनेसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गावातील पशुगणना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. भटक्या गायी व कुत्र्यांच्याही माहितीचे संकलन पाळलेल्या गायवर्गीय मय पशु शेतकरी पशुपालकांकडील पाळीव पशुधन उद्योग संस्था, संघटनांनी घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती तसेच कोंबडी, बदक, टर्की, लहान पक्षी, शहामृग व इमू यासारखे कुक्कुट पक्षी याव्यतिरिक्त भटकी कुत्री, भटक्या गाई आणि भटका पशुपालक समुदाय यांचीही माहिती संकलित करण्यात येत आहे.