जिल्ह्यात ९ हजार ९०५ जनावरांचे लसीकरण पूर्ण

रत्नागिरी:- तालुक्यामध्ये लंपी स्कीनचे बाधित पाळीव जनावरे आढळून आली नसली तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ९ हजार ९०५ जनावरांना लस देण्यात आली असल्याचे पशु विभागाकडून सांगण्यात आले.

लंपी स्कीन हा विषाणूजन्य त्वचारोग आहे. विदेशी वंशाच्या आणि संकरीत वंशाच्या गायींमध्ये देशी वंशाच्या गाईपेक्षा रोग बाधेचे प्रमाण अधिक आढळून येते. उष्ण व दमट हवामान रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. या आजारामुळे होणार्‍या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी जनावरांचे विवीध स्त्राव जसे डोळयातील पाणी, नाकातील स्राव, लाळ आदीमधुन हा विषाणु बाहेर पडुन चारा व पाणी दुषित होवुन इतर जनावरांना या रोगाची लागण होवु शकते. या रोगामध्ये अंगावर १० ते २० मीमी व्यासाच्या गाठी येतात. सुरवातीस भरपुर ताप, डोळयातून नाकातून चिकट स्त्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद,  दुध उत्पादन कमी व काही जनावरात पायावर सुज येणे व लंगडणे या सारखी लक्षणे दिसुन येतात. रोगी जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव रत्नागिरी तालुक्यामध्ये आजअखेर आढळुन आलेला नाही. परंतू सदरच्या रोगाबाबतचे रोगप्रतिबंधक स्वच्छ लसीकरण २२ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेले असुन शासनाकडुन दोन टप्प्यांमध्ये एकुण १० हजार लस मात्रा उपलब्ध झाल्या असुन त्याचे वाटप सर्व पशुवैदयकीय दवाखान्यांना गाय वर्ग पशुधनाच्या आकडेवारी नुसार वाटप करण्यात आलेले आहे. तालुक्यामध्ये एकुण २० व्या पशुगणनेनुसार गायवर्ग संख्या ३२ हजार ६३० एवढी आहे. त्यांपैकी ९ हजार  ९०५ गायवर्ग जनावरांना लसिकरण करण्यात आलेले आहे. उर्वरीत लसमात्रा टप्प्याटप्याने प्राप्त होणार आहेत.

तरी रत्नागिरी तालुक्यातील सर्व पशुपालकांनी त्यांच्या गायवर्ग पशुधनाचे लसिकरण करून घ्यावे. त्यासाठी नजिकच्या पशुवैदयकीय दवाखाना किंवा पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती रत्नागिरी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार रत्नागिरी, गट विकास अधिकारी पंचायत समिती, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांनी केले आहे.