जिल्ह्यात साडेसात हजार वीज ग्राहकांना महावितरणचा झटका

रत्नागिरी:- थकबाकी असलेल्या जिल्ह्यात तब्बल 7 हजार 564 ग्राहकांना महावितरण कंपनीने मोठा झटका दिला आहे. वारंवार सांगून, आवाहन करूनही थकीत बिल न भरल्याने या सर्वांची वीज जोडणी तोडली आहे. 31 मार्च 2020 अखेरीस महावितरणचे जिल्ह्यात 12 हजार 298 थकबाकीदार ग्राहक होते. त्यांच्याकडे 8 कोटी 73 लाख इतकी थकबाकी शिल्लक होती. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने कडक पाऊले उचलली आहेत. 

कोरोना महामारीने महावितरण कंपनीलाही अडचणीत आणले आहे. लॉकडाउनमुळे सर्व ठप्प झाले होते. अनलॉकनंतर महावितरण कंपनीने सलग तीन महिन्याची ग्राहकांना बिले दिली; मात्र बिलांचा आकडा पाहून अनेक ग्राहक चक्रावले. वाढीव बिलाचा विषय त्यानंतर सुरू झाला तो अजूनही गाजत आहे. विरोधी पक्षांनीदेखील याबाबत आवाज उठवला आणि बिलं न भरण्याचा अनेक ग्राहकांनी निर्धार केला. वसुलीवर याचा मोठा परिणाम होऊन महावितरणसमोर थकबाकी वाढतच गेली. 
महावितरण आर्थिक संकटात आल्यामुळे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणची थकीत बिलं भरा, असे आवाहन केले.
मात्र ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरण कंपनीने कठोर पावले उचलली आहेत. मार्च 2020 ची बिले अजून न भरणार्‍या ग्राहकांना कंपनीने झटका दिला आहे. जिल्ह्यातील अशा तब्बल 7 हजार 54 वीज ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने तोडली आहे. यात फेब्रुवारी महिन्यात 7 हजार 296 ग्राहकांची तर मार्च महिन्यात 268 ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात आली आहे. 
मार्च 2020 मध्ये एकूण थकबाकीदार 12 हजार 298 ग्राहक आहेत. जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य आणि लघु उद्योगांची अजूनही 8 कोटी 73 लाख थकबाकी आहे.जमेची बाजू म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये जिल्ह्यातील 1 लाख 63 हजार 934 ग्राहकांनी एकूण 19 कोटी 32 लाख बिलांचा भरणा केला आहे.