जिल्ह्यात वर्षभरात लाचखोरीची सहा प्रकरणे उघड 

रत्नागिरी:- सरकार दरबारी असलेले काम पूर्ण करण्यासाठी सरकारी बाबूंकडून लाचेची मागणी केली जाते. गलेलठ्ठ पगार असूनही त्यांच्याकडून सामान्य नागरिकांची पिळवणूक झाल्यावर ते अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून अशा लाचखोरांना रंगेहाथ पकडले जाते. जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2022 या वर्षभराच्या कालावधीत लाचखोरीची 6 प्रकरणे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 प्रकरणे उघडकीस आली. तसेच कोकण विभागात वर्षभरात एकूण 84 प्रकरणांमध्ये लाचखोरांवर कारवाई करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.

कोकणात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात लाच घेतल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंध विभाग लाचखोरीला प्रतिबंध घालण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. वारंवार आवाहन करत असले तरी लाचखोरी कमी होताना दिसत नाही. पैसे दिल्याशिवाय कागद हलतच नाही, अशी अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यासाठी शासनाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सतत कार्यरत आहेत; परंतु लाचखोरीचे प्रकरण काही थांबण्याचे नाव घेत नाही.  सन 2021 ची आकडेवारी पाहता काही ठिकणी ही प्रकरणे कमी झाली आहेत तर काही ठिकाणी वाढली आहेत.

कोकण विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वांत कमी लाचखोरीची प्रकरणे झालेला जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा. गेल्या वर्षी ही तीन आणि या वर्षीही अशी तीन प्रकरणे उघड झाली आहेत तर रत्नागिरी जिल्ह्याचे चित्र वेगळे आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात लाचखोरीची तीन प्रकरणे घडली होती. मात्र, यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन सहा लाचखोरांना पकडण्यात आले. सर्वांत जास्त लाचखोरांमध्ये ठाणे जिल्ह्याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी ठाण्यात 40 लाचखोरांचा पर्दाफाश केला होता तर यंदा 39 लाचखोरांचा समावेश आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यात गतवर्षी 14, तर यंदा 15 प्रकरणे झाली आहेत. नवी मुंबईमध्ये गतवर्षी 13, तर यंदा 10 प्रकरणे आहेत. रायगड जिल्ह्यात गतवर्षी 10 तर यंदा 11 लाचखोरीची प्रकरणे उघड झाली आहेत. गेल्या वर्षी कोकणात 87 तर यंदा 84 प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केली आहेत.