रत्नागिरी:- आरोग्य विभागाकडून १२ ते १४ वयोगटातील साधारणत: सहावी ते आठवीत शिकणार्या मुलांसाठी २१ मार्चपासून कोविड लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ७० हजारापेक्षा अधिक लाभार्थींना ही लस देण्यात येणार आहे असे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द यांनी सांगितले आहे.
कोविड लसीकरणाचा आठवा टप्पा सुरू करण्यात येत आहे. या टप्प्यात १२ ते १४ वयोगटातील शाळकरी मुलांचे लसीकरण केले जाईल.
आत्तापर्यंतच्या सात टप्प्यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनची लस वापरण्यात आली आहे. आता मुलांसाठी मात्र कोरबेवॅक्स लस उपलब्ध झाली आहे. या लसीच्या एका व्हायलमध्ये (बाटली) २० डोस आहेत. एका इंजेक्शनमधून ०.५ मिली इतका डोस दिला जाईल. कोव्हॅक्सिनप्रमाणेच कोरबेवॅक्स लसीचे दोन डोसमधील अंतर चार आठवडे राहील. १५ मार्च २००८ ते १५ मार्च २०१० मध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना ही लस घेता येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ही लस देऊन या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, दुसरा टप्पा फ्रंट लाईन वर्कर, तिसरा टप्पा ४५ वयोगटावरील सहव्याधी व ६० वयोगटासाठी घेण्यात आला. ४५ वयोगटावरील सर्व नागरिकांसाठी चौथा टप्पा, १८ ते ४४ वयोगटासाठी पाचवा, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना सहावा टप्प्यात आणि १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी सातवा टप्पा घेण्यात आला. आठव्या टप्प्यात जिल्ह्यासाठी १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी २० हजार ४०० डोस उपलब्ध झाले आहेत. मुलांचे लसीकर करुन घ्या असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने यांनी केले आहे.
जिल्हयात आजपर्यंत कोविड लसीकरणाची पहिल्या डोसची मात्रा १० लाख ५३ हजार ७२९ देण्यात आली असून, हे प्रमाण ९७.४० टक्के आहे. दुसर्या डोसची मात्रा ८ लाख ७८ हजार २० असून हे प्रमाण ८१.१६ टक्के आहे. आतापर्यंत एकूण १९ लाख ३१ हजार ७४९ लसींच्या मात्रा देऊन नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित केले आहे. २००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले पात्र (१५ ते १८ वर्षे वयोगटातील) पहिल्या डोसची मात्रा ४९ हजार ३४७ लसीच्या मात्रा दिल्या असून ते प्रमाण ६८.७८ टक्के आणि दुसर्या डोसची मात्रा ३४ हजार ६३१ असून हे प्रमाण ४८.२७ टक्के आहे.