रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 447 आणि त्यापूर्वीचे 67 असे एकूण 514 नवे पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नवे 514 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 62 हजार 614 झाली असून पॉझिटिव्हीटी रेट वाढून 8.57 टक्के इतका झाला आहे.
मागील काही दिवस रुग्णसंख्या नियमितपणे 500 च्या दरम्यानच आहे. सोमवारी 5 हजार 398 चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात 331 जण बाधित सापडले होते. मंगळवारी 4 हजार 725 चाचण्या करण्यात आल्या असून यात 431 तर त्यापूर्वीचे 123 असे एकूण 554 जण कोरोना बाधित सापडले होते. बुधवारी 5 हजार 564 चाचण्या करण्यात आल्या असून यात 444 आणि त्यापूर्वीचे 80 असे 524 बाधित रुग्ण सापडले होते. गुरुवारी पुन्हा 514 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 5 हजार 216 चाचण्या करण्यात आल्या असून यात 447 तर त्यापूर्वीचे 67 असे 514 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 215 पैकी 259 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 3 हजार 1 पैकी 188 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने सापडलेल्या 514 रुग्णांमुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 8.57 टक्के इतका झाला आहे. मंगळवारी 661 रुग्ण बरे झाले. जिल्ह्याचे कोरोनामुक्तीचे प्रमाण 87.65 टक्के आहे.
जिल्ह्यात 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी तालुक्यात 4, चिपळूण 2, दापोली 1, खेड 1, लांजा 1 आणि संगमेश्वर तालुक्यात 2 मृत्यू झाले आहेत. 11 जणांच्या मृत्यूंमुळे जिल्ह्याचा मृत्युदर वाढून 2.86 टक्क्यांवर पोहचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 789 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.