जिल्ह्यात तब्बल 2 हजार 944 बांधकामे अनधिकृत; लवकरच हातोडा पडणार 

रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात तब्बल 2944 बांधकामे सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली असून या प्रकरणात आतापर्यंत 329 जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यामध्ये अनेक भागात पूर्वापार खाडी व समुद्रकिनारी अनेक वसाहती, वाड्या व वस्त्या उभ्या आहेत. विशेषत: मच्छीमार समाजातील लोकांचे वास्तव्य किनार्‍या लगत आहे.  यात अनेक घरे ही साठ ते सत्तर वर्षापासून तर काही देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून वसलेली आहेत. गेल्या काही वर्षात महानगरामध्ये राहणार्‍या अनेक उच्चभ्रूंनी किनार्‍यालगतच्या जागा विकत घेऊन या ठिकाणी ‘सेकंड होम’ उभी केली आहेत. काहींनी व्यवसायासाठी किनार्‍यालगत इमारती उभ्या केल्या आहेत, त्यामध्ये स्थानिकांचा समावेशही आहे. यात अनेक ठिकाणी सीआरझेडचे उल्लंघन झाल्याचे पहायला मिळत आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्यावर आरोप करीत दापोलीत समुद्रकिनार्‍यावर सीआरझेडचे उल्लंघन करुन रिसॉर्ट उभारल्याचा गौप्यस्फोट केला होता. तर मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांनीही किनारपट्टीवर एक घर घेऊन विकसित केले होते. हे घर विकसित करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे नार्वेकर यांनी आपल्या किनारपट्टीवरील घराचे बांधकाम स्वत:च पाडून टाकले होते. मात्र रिसॉर्टचा विषय अद्यापही गाजत आहे.

त्यानंतर सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करुन खाडी व समुद्र किनार्‍यावर करण्यात आलेल्या अनधिकृत पक्क्या बांधकामांची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अभियान राबवले होते. या अभियानांतर्गत सीआरझेड 1, सीआरझेड 2 व सीआरझेड 3 अशा तीन टप्प्यातील सीआरझेड उल्लंघन केलेल्या घरांची नोंदणी करण्यात आली होती.

यात अत्यंत धोकादायक अशा सीआरझेड 1 मध्ये दोन घरांची नोंद असून यात दापोली व मंडणगड तालुक्यातील एका-एका वास्तूचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शहरी भागात नगरपालिका, नगरपंचायतअंतर्गत सीआरझेडचे उल्लंघन करुन 972 घरे, दुकाने व व्यवसाय उभारण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक अनधिकृत बांधकांची नोंद सीआरझेड 3 मध्ये झाली आहे. त्यामध्ये तब्बल 1970 बांधकामांच्या नोंदी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेल्या आहेत. एकूण 2944 अनधिकृत बांधकामे आहेत. जिल्ह्यातील पाच उपविभागीय कार्यालयांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

जिल्ह्यात सीआरझेडचे उल्लंघन करुन सर्वाधिक बांधकामे  गुहागर तालुक्यात 1992 इतकी नाेंंद करण्यात आली आहेत. तर मंडणगड तालुक्यात अवघ्या 1 अनधिकृत बांधकामाची नोंद आहे. रत्नागिरी तालुक्यात 60, संगमेश्वरमध्ये 5, राजापूर 527, चिपळूण तालुक्यात 145, दापोलीत 185, खेड तालुक्यात 29 अनधिकृत बांधकामांची नोंद आहे. प्रशासनाकडून 329 जणांना आतापर्यंत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत तर न्यायालयात 35 बांधकामांबाबत खटले दाखल करण्यात आलेले आहेत. न्यायालयात सहा प्रकरणांना स्थगिती मिळालेली आहे. पर्यावरण कायद्यांतर्गत 10 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे नोंदवण्यात आलेली आहे.