रत्नागिरी:-जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये 1 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 2 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत जिल्ह्यातील 7 हजार 790 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार आहे.
पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर असे वर्षातून दोन वेळा स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. या सार्वजनिक स्त्रोतांच्या पिण्याच्या पाण्याची स्वच्छता सर्वेक्षणासाठी ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांच्यामाफत सार्वजनिक स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व वैद्यकिय अधिकारी यांचेवर या सर्वेक्षणाची जबाबदारी आहे. हे अत्यंत वैशिष्टपूर्ण सर्वेक्षण असून सर्वेक्षणाच्या निकषांनुसार ग्रामपंचायतींना स्त्रोतांच्या वापरानुसार व निर्माण झालेल्या जोखीमेनुसार वर्गीकरण करुन व त्यानुसार लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड वितरीत केले जाणार आहे. यामध्ये लाल कार्ड ग्रामपंचायतींमधील 70 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमींच्या स्त्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात येणार आहे. ग्रुप पंचायतीत एका गावात जरी वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावांचे नाव टाकून लाल कार्ड दिले जाईल. 70 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्त्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड दिले जाईल. पिवळे कार्ड ग्रामपंचायतीमधील 70 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखमीच्या स्त्रोतांवर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे. ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये देखील एका गावात वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावाचे नांव टाकून पिवळे कार्ड देण्यात यावे. तसेच चंदेरी कार्ड सलग पाच वर्षे साथीचा उद्रेक न झालेल्या व पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेल्या असे दोन्ही निकष पूर्ण करणार्या ग्रामपंचायतीस चंदेरी कार्ड देण्यात येते.