रोहन बनेंचा उपक्रम; पर्यटन व्यावसायातून रोजगार निर्मिती
रत्नागिरी:- पर्यटन व्यावसायातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील बचत गटात कार्यरत असलेल्या 150 महिलांना चारचाकी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्याच महिलांना आपापल्या तालुक्यातील पर्यटन स्थळे, खाद्य संस्कृती याची माहिती दिली जाणार आहे. त्या महिलांना परिपूर्ण गाईड म्हणून पुढे आणले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये टुरिस्ट गाईड प्रशिक्षणाला आवश्यक निधीची तरतुद करण्याला हिरवा कंदिल मिळाला आहे. महिलांना चारचाकी चालवण्याच्या प्रशिक्षणासह गाईडचे प्रशिक्षण देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून वीस लाख रुपये निधीची तरतुदही केली गेली आहे. गाईडसंदर्भातील प्रशिक्षण एका खासगी संस्थेमार्फत दिले जाणार आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पर्यटक दाखल होतात. त्यात अनेक महिलांचे गु्रपही असतात. गणपतीपुळे, मार्लेश्वर, दापेालीची चंडिका देवी, राजापूरची गंगा यासारखी प्रसिध्द पर्यटनस्थळेच पर्यटकांना माहिती असतात; परंतु प्रत्येक तालुक्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, तिथे पर्यटक गेलेले नाहीत. त्याची माहिती जिल्ह्यात येणार्या पर्यटकांना करुन देणे, तिथे नेऊन माहिती देणे यासाठी तज्ज्ञ गाईडची आवशक्यता आहे. केरळ, गोव्यामध्ये या गाईडच्या माध्यमातून रोजगारही मिळतो. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देतानाच प्रशिक्षीत गाईड बनविण्यात येणार आहे. या दुहेरी भुमिका महिला सहजपणे पार पाडू शकतील. तसेच महिलांना रोजगारही मिळू शकेल. जिल्ह्यात गाईडच नसल्यामुळे पर्यटकांना माहिती देणे शक्य होत नाही. ती उणिव जिल्हा परिषदेच्या रत्नतरुणी योजनेतून भरुन काढली जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षण घेणार्या महिलेला परिपूर्ण माहिती दिली जाईल. प्रशिक्षण घेतल्याचे सर्टिफिकेटही त्या महिलांना दिले जाणार आहे. अनेक पर्यटक कुटूंबे, महिलांना आकर्षित करुन घेण्यासाठीचा हा उपक्रम लवकरच प्रत्यक्षात अमलात जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 150 महिलांना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातनू असा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे. पर्यटनातून महिलांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे.