जिल्हाधिकारी यांनी घेतली विशेष बैठक
रत्नागिरी:- दरड प्रवण गावांवर विशेषत: डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांवर सर्व यंत्रणेने समन्वयाने लक्ष द्या. ग्रामस्थांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
तालुकानिहाय आढावा घेवून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले तलाठी, सरपंच, पोलीस पाटील यांच्या मदतीने दरड प्रवण गावांची माहिती घ्या. विशेषत: भविष्यात अपघात घडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणची वस्ती संवाद साधून स्थलांतरीत करा त्यासाठी बैठक घ्या. पाण्यामध्ये असणाऱ्या घरांबाबतही सतर्क राहून त्यांना तेथून हलविण्याचे नियोजन करा. नातेवाईक, समाजमंदिर, सभागृहांत त्यांची सोय करा. शिवभोजनाच्या माध्यमातून त्यांना जेवणाची सुविधा द्या. अशा प्रत्येक गावांमध्ये तरुण मंडळांच्या सहाय्याने गावांमध्ये अधिकारी-कर्मचारी नियुक्त करुन सेवा द्या.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे लाकडी साकव, लोखंडी साकव याबाबतही सद्यस्थिती पाहून त्यांचा अहवाल करा. कोणतीही दुर्घटना घडणार नाही याबाबत सर्वांनी समन्वयाने अधिक सतर्क रहा, असेही ते म्हणाले.