जिल्ह्यातील आशा, गटप्रवर्तक महिला संप सुरू ठेवण्यावर ठाम

रत्नागिरी:- आशा व गटप्रवर्तक महिला यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरु केलेला संप शासन जीआर काढत नाही, तोपर्यंत सुरुच ठेवायचा असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संपाची तिव्रता वाढवण्यासाठी लवकरच निदर्शने करण्यात येणार आहेत. या संपात रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे बाराशेहुन अधिक आशा व गटप्रवर्तक महिला सहभागी झालेल्या आहेत.

गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला विविध मागण्यांसाठी आंदोलने करत होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली. त्यानुसार गेले महिनाभर संप चालू आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार शासकीय शासनाकडून आदेश काढलेला नाही. त्यामुळे राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध तिव्र नाराजी आहे. त्यामुळे संप करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे. संप मागे घेतला जावा यासाठी संघटनेला आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर संघटनांकडून संप मागे घेण्याच्या हालचाली केल्या जातील असा अंदाज होता. मात्र शासन निर्णय काढलेला नसल्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच पुढे जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याच नियोजन करण्याच्या सुचनाही दिलेल्या आहेत. मुंबईतही लवकरच मोर्चा काढण्याचे नियोजन कृती समितीमार्फत केले जात आहे.