रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियोजनबद्ध काम केले. विशेष म्हणजे कोरोना काळात विविध उपक्रम राबवत कोरोनाबाबत जनजागृती केली. चिपळूणमध्ये पूरस्थितीत रत्नागिरी पोलिसांनी केलेली कामगिरीची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली. या सर्व कामगिरीचा आलेख पाहता पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’कडून दखल तसे प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्याचे पोलिस दल आणि जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या पूर्वी गडचिरोली येथेही उत्तम काम केले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात त्यांनी अनेक आधुनिक बदल केले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनापासून लांब ठेवण्यासाठी अनेक शिबीरे असतील,वेळोवेळी मेडिकल कीट पुरवणे, पोलिस कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी स्वतंत्र भव्य कोरोना सेंटरही सुरु केले. इतकेच नव्हे तर गावोगावात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठीही पोलिस तैनात होते. कोरोना आटोक्यात येतानाच चिपळूणमध्ये जुलै महिन्यात पूरस्थिती निर्माण झाली. हजारो कुटुंबांचे संसार पाण्याखाली गेले होते. अशावेळी मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस सर्वप्रथम चिपळुणात पोहचले. कोरोना रुग्ण असतील वा इतर नातेवाईक यांना बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न पोलिसांनी केले. कोरोना काळात गावागावात बैठका घेवून पोलिसांनी जनजागृती केली. यासाठी प्रत्येक तालुका पोलिस ठाण्याकडे स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या सक्त सूचनांमुळे या काळात सण उत्सवही नियमात राहून साजरा करण्यात आले. परिणामी कोरोना संख्या आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे.
आरोग्य विभागाला ज्या ज्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आहे, त्याठिकाणी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मदतीचा हात दिला आहे. वर्ल्ड ऑफ बूक रेकॉर्डस लंडनकडून या सर्व कामाची दखल घेऊन प्रमाणपत्र देवून कौतुक करण्यात आले आहे.