अविश्वास ठराव दाखल करणारे दोन सदस्य अनुपस्थित
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड ग्रामपंचायत सरपंच फरजाना डांगे यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव अखेर फेटाळला गेला. अविश्वास ठरावावर स्वाक्षरी करणारे दोन सदस्यच यावेळी अनुपस्थित राहिल्याने, अविश्वास ठराव आणणार्यांना चपराक बसली आहे. या विषयात पालकमंत्री उदय सामंत व बाबू पाटील यांनी किंगमेकरची भूमिका बजावत, सदस्यांचे मनपरिवर्तन करण्यात यश मिळवल्याने, सौ. डांगे यांचा मार्ग सुकर झाला.
जयगड ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक समजली जाते. जिंदाल कंपनीसह अनेक व्यवसाय, जेटी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या ग्रामपंचायतीवर सध्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या सौ. फरजाना डांगे या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्या कुणाला विचारात घेत नाहीत असा आरोप करीत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य व थेट सरपंच अशी दहा संख्या आहे. यातील सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या तक्रारीवर सही केली होती.
पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर हा विषय बाबू पाटील, विभागप्रमुख बाबय कल्याणकर, अजिम चिकटे, नारायण काताळकर, सलिम मिरकर यांनी आणला. त्यानंतर पालकमंत्री ना. सामंत यांनी या विषयात लक्ष घालून सदस्यांशी चर्चा केली.
अविश्वास ठरावासाठी शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. परिविधाधीन तहसीलदार गिड्डे यांनी सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या सभेला अविश्वास ठराव अर्जावर स्वाक्षरी करणार्या देवयानी खाडे, देवयानी मयेकर, अमेय परकर, विशाल झगडे व दर्शना चव्हाण हे सात पैकी पाच सदस्य उपस्थित होते. त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजून मतदान केले. परंतु अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी आठ मतांची आवश्यकता होती. ते पूर्ण न झाल्याने अविश्वास ठराव फेटाळला गेला. तक्रार अर्जावर सही करणारे दोन सदस्य अनुपस्थित राहिले.
सरपंच सौ. फरजाना डांगे यांच्या विरोधात असणार्यांना त्यामुळे चपराक बसली आहे. सरपंच डांगे यांचा अविश्वास ठराव फेटाळला गेल्याने त्यांचे सलीमभाई मिरकर,नासीर संसारे, अनिस अडूळकर, मुफ्ती साबीर डांगे यांनी अभिनंदन केले. ठराव नामंजूर व्हावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली बाबू पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.