शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची माहिती
रत्नागिरी:- प्रशासनाला जेवढी मुदत द्यायची तेवढी दिली आहे, आता झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्याची वेळ आली आहे . संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या अदानी ग्रुप विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. स्वातंत्र्यदिनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितेत खा . विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री बचाव न्यायहक्क समिती यांच्यासह हजारो शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके व तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंडयाशेठ साळवी यानी पत्रकार परिषदेत दिली .
संगमेश्वर तालुक्यातील कुंडी व निगुडवाडी येथील जमिनीचा घोटाळा सह्याद्री बचाव न्यायहक्क समितीने बाहेर काढला होता प्रमुख तक्रारदार दिनेश कांबळे यानी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांची भेट घेऊन हा घोटाळा कसा झाला आहे याची माहिती दिली होती. अदानी ग्रुप आणि रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपन्या व त्यांचे दलाल यांच्या संगनमताने संगमेश्वर तालुक्यात शेकडो हेक्टर शेतजमीन लाटल्याचा प्रकार खा. विनायक राऊत यानी उघडकीस आणला. जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाकडे याबाबतची तक्रार खा . विनायक राऊत यानी केली होती. मात्र चौकशीचे आश्वासन देऊन राज्यशासनाने या बड्या उद्योजकाना पाठीशी घातल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यानी केला आहे.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख पुढे म्हणाले की , संगमेश्वर तालुक्यातील मौजे निगुडवाडी आणि कुंडी या गावातील समाहीक वर्षानुवर्षे वहिवाट असलेल्या जमिनी शेतीसाठी वापरात असलेल्या जमिनी ह्या रायपूर राजनांदगाव, वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड नागपूर व अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपन्यानी राजनांदगाव ते वरोरा गडचिरोली, चंद्रपूर येथील २८४.२७.९७ हेक्टर आर. वनक्षेत्र वर्ग करण्याच्या बदल्यात निगुडवाडी येथील २५०.१३.०० हेक्टर आर क्षेत्रयापैकी १०६.७.१७ हेक्टर आर जमीन कुंडी येथील १७.३८.८७ हेक्टर आर क्षेत्र सन २०१५ टे २०१८ या कालावधीत जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत .
महाराष्ट्र कुल वहिवाट व जमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३ नियम १५६ चे कलम ३६ (१) नुसार अटी व शर्थीचे पालन न करता या कंपन्यांनी पूर्वनियोजीत दलाल नेमून शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणूक करून हडप केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यानी केला आहे . कंपन्यांचे सोकावलेले बोके मलीदा खाण्यासाठी दिसेल त्याची फसवणूक करत सुटले आहेत. काही अधिकाऱ्याना पैशाचे आमिष दाखवून खोटी व दिशाभूल करणारी कागदपत्रे तयार करून मुकत्याराने जमीन मालकाच्या ठिकाणी बोगस जमीनमालक उभे करून खोट्या मुखत्यारपत्राद्वारे जमिनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख चाळके यानी केला आहे.
या प्रकरणात मोठे रॅकेट असून जमिनी खरेदीचे व्यवहार वारसतपास, फेरफार नोंदी, सातबारा उतारे आदी गोष्टी जिल्हाधिकारी कार्यालायकडून कोणत्याही प्रकारची तपासणी अथवा चौकशी न करता अवघ्या एका आठवड्यात या जमिनी वनविभागाकडे हस्तांतरीत करण्याचा विक्रमच करून दाखवला आहे . जमीन हस्तांतर प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने एका आठवड्यातच जमीन हस्तांतर करण्याच्या “गतीमान” कारभाराचा नामूनाच दाखवून दिला आहे, असा खोचक टोला शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यानी लगावला आहे .
प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढताना शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके पुढे म्हणाले भूमी अभिलेख उपनिरीक्षक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मोजणी न करता तसेच हद्दी सीमांकान न करता कंपनीने खोटा नकाशा तयार करून हिस्सेदारांच्या शिल्लक जमिनी व सहहिस्सेदारांच्या परवानगी न घेता दुय्यम निबंधक देवरुख तलाठी नीवे, मंडळ अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, वन अधिकारी याना हाताशी धरून बोगस जमीनमालक उभे करून जमिनी लाटल्या आहेत. या व्यवहारामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून मूळ जमीनमालकाना मात्र कंपनी व त्यांच्या दलालांनी उपाशी ठेवण्याचा प्रकार केला आहे.
या अन्यायाविरोधात शिवसेना सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. जोपर्यंत माझ्या शेतकाऱ्याना न्याय मिळत नाही तसेच खोट्या कागदपत्रांद्वारे लाटलेल्या जमीनी शेतकाऱ्याना परत मिळत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. प्रशासनाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा गर्भित इशारच शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यानी दिला आहे. १५ ऑगस्ट रोजी शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार
असून खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री बचाव न्यायहक्क समिती कुंडी व निगुडवाडी येथील ग्रामस्थ यांच्यासोबत हजारो शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंडयाशेठ साळवी यानी दिली.