गुहागरमधील ४ ग्रामपंचायतींना पुरस्कार
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता २०२३-२४ च्या अभियानात प्रथम क्रमांक पटकावला तसेच गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने द्वितीय तर चिखली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळाला. आणखीन तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारांची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी केली आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतीमधून सर्वात जास्त गुण प्राप्त करण्याऱ्या नऊ ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून करण्यात आली होती. त्यातून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची नावे निश्चित करण्यात आली. प्रथम क्रमांक पटकावलेल्या कळसवली ग्रामपंचायतीला ६ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या खामशेत ग्रामपंचायतीला ४ लाख रुपये आणि चिखली ग्रामपंचायतीला ३ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. या पुरस्काराचे वितरण पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेकडून जाहीर केलेल्या ६ पैकी ४ पुरस्कार गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतीने पटकावले आहेत. त्यामध्ये गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने स्वच्छतेमध्ये द्वितीय पुरस्कार, तृतीय पुरस्कार चिखली ग्रामपंचायतीने तर विशेष पुरस्कार आबलोली आणि उमराठ ग्रामपंचायत यांना जाहीर केला आहे. विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती
- स्व. वसंतराव नाईक पुरस्कार ः आबलोली ग्रामपंचायत (ता. गुहागर, सांडपाणी व्यवस्थापन)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ः नाचणे ग्रामपंचायत (ता. रत्नागिरी, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन)
- स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार ः उमराठ ग्रामपंचायत (ता. गुहागर, शौचालय व्यवस्थापन)