गळतीमुळे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाणीच पाणी; मध्यरात्री उडाली मोठी धावपळ

रत्नागिरी:-रविवारपासून जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असून या पावसाने जिल्हा रुग्णालय इमारतीच्या कामातील बोगसगिरी बाहेर काढली आहे. इमारतीला  ठिकठिकाणी गळती लागली असून पावसाचे पाणी साचून जिल्हा रुग्णालयाची अवस्था तळ्यासारखी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे.  

जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले असताना जिल्हा रुग्णालयाची इमारत तर तलाव बनल्याचे चित्र आहे. निकृष्ट बांधकामामुळे जिल्हा रुग्णालय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी जिन्यासह पॅसेजमध्ये जमा झाले. जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांचे नातेवाईक देखील याठिकाणी आहेत. रात्री इमारतीत पाणी साचल्याने नातेवाईकांना याचा मोठा त्रास झाला.