कोकण रेल्वे जूनपासून विजेवर धावणार; विद्युतीकरणाचे 72 टक्के काम पूर्ण 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम 72 टक्के पूर्ण झाले आहे. जून 2021 अखेरपासून रोहा ते ठोकूर या 440 किलोमीटर लांबीच्या मार्गावरून रेल्वे गाड्या विजेवर धावण्याचे नियोजन कोकण रेल्वेतर्फे सुरु आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते रत्नागिरी मार्गाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर रेल्वे धावेल अशी शक्यता आहे.

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण या दोन्ही टप्प्यातील कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. प्रवास वेगवान व्हावा या उद्देशाने याला महत्त्व दिले आहे. कोरोनामुळे सध्या कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या अल्प असली तरीही भविष्यात नियमित गाड्या सुरु होतील असा अंदाज आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या विजेवर धावू लागल्यानंतर कोकण रेल्वेच्या इंधनखर्चात सुमारे 200 कोटी रुपयांची बचत होणार आहे. विद्युतीकरण कामाचा ठेका लार्सन अँण्ड टूब्रो या कंपनीने घेतला असून 440 किलोमिटर लांबीच्या विद्युतीकरणासाठी सुमारे 1100 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आत्तापर्यंत 475 कोटीचा खर्च झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणासाठी खारेपाटण, कणकवली, थिवीम तसेच रत्नागिरी माणगांव, कळंबणी आणि आरवली या स्थानका परिसरात विद्युत सबस्टेशन उभारली जात आहेत.

बिजूर ते ठोकूर या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात बिजूर ते ठोकूर टप्प्याच्या कामाची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. रोहा ते रत्नागिरी या टप्प्याची सुरक्षा मानक तपासणी अद्याप व्हायची आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर रोहा ते रत्नागिरी या मार्गावर विजेवर गाड्या धावणार आहेत. रत्नागिरी ते बिजूर या टप्प्यात ठिकठिकाणी काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. यात कणकवली रेल्वे स्थानकापर्यंत विद्युत खांब उभारणीचे काम पूर्ण होत आले आहे. तर त्यापुढील टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर सुरक्षा तपासणी, यात आलेल्या त्रुटी दूर करून जूनपासून सर्व रेल्वे गाड्या विजेवर धावतील, अशी माहिती कोकण रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.