जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’चा तिसरा टप्पा शिल्लक: ना. सामंत 

रत्नागिरी:- कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाली असून माजी आमदार सुभाष बने यांच्यासह जिल्हाप्रमुख विलास चाळके, जि.प.माजी अध्यक्ष रोहन बने, रचना महाडीक आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. हा दुसरा टप्पा असून तिसरा टप्पा शिल्लक असल्याचे सांगून जिल्ह्यातील उरलेली उबाठा रिकामी करण्याचा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी बंडाळी उफाळली आहे. काही दिवसांपासूनच राज्यात ऑपरेशन टायगरला शिवसेनेने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या शेकडो सहकार्‍यांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता.

पालकमंत्री उदय सामंत यांनी एक सूचक वक्तव्य केले होते. टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करणार..असे सांगत ऑपरेशन टायगर हे १५ तारखेला तुम्हाला कळेल, असे सांगितले होते. त्यानुसार शनिवारी झालेल्या आभार सभेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक पक्षप्रवेश झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फार मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपासून मोठे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु होती. अखेरीस या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, सौ.रचना महाडीक आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह धनुष्यबाण हातात घेतला आहे. जिल्ह्यात उबाठाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने उबाठाचे गड दिवसेंदिवस ढासळू लागले आहेत. एकामागोमाग एक बडे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.

नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. प्रचार, अपप्रचार झाले मात्र जिल्ह्यातील जनतेने तीन आमदार निवडून दिले. राजापूरातून किरण सामंत, रत्नागिरीतून उदय सामंत, दापोली-खेडमधून योगेश कदम यांना भरभरुन यश मिळाले, असे देखील नामदार सामंत यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले म्हणून काहींच्या पोटात पोटशूळ उठला आहे, अशी टीका पालकमंत्री सामंत यांनी केली आहे.

आज मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताच पक्षाची ताकद वाढत चालली आहे. आपण सर्वजण एकसंघ राहिलो तर कोणताही मायचा लाल रोखू शकणार नाही. ही ताकद आपण अशीच अबाधित ठेवूया, असे आवाहन नामदार उदय सामंत यांनी केले.

आपल्या भाषणात पालकमंत्री उदय सामंत यांनी तोंडभरून कौतुक केले. विरोधकांनी लाडकी बहिण योजना बंद करणार.. असे फेक नरेटीव्ह पसरविण्यास सुरुवात केली आहे. पण जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींना दिला.