किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी चिपळूण तालुक्यातील युवकाचे अपहरण करून खून

चिपळूण: येथील तरुणाचे अपहरण करून त्याची पुणे जांभूळरोड येथे दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ आहे. किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे कारण पुढे आले असून या प्रकरणी पुणे पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर केवळ दोन तासांमध्ये तीन संशयिताना ताब्यात घेतेले आहे. सौरभ शैलेंद्र मयेकर (वय 21, मूळ गाव रा. वालोपे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. सध्या रा. एक्झारबीया सोसायटी, जांभूळ, ता. मावळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार तिघांनी सौरभचे तरुणाचे अपहरण केले. त्याला साते गावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी व्हिजन सिटी जांभूळ येथील 18 वर्षीय संशयित आरोपीला व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आरोपी जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे.

पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मयेकर याची संशयित आरोपींसोबत जांभूळ रोडवर भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून संशयित आरोपींनी मयेकर याची गाडी अडवून त्याचे अपहरण केले. ब्राह्मणवाडी साते गावच्या हद्दीत असलेल्या खापरे ओढ्याजवळ नेऊन त्याला मारहाण केली तसेच डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी तातडीने दोन पथके तयार केली. मोबाइल लोकेशनच्या आधारे दोन तासांमध्येच तिन्ही संशयित आरोपींना पिंपरी- चिंचवड येथून अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील जावळे, सुनील मगर, अमोल कसबेकर, आशिष काळे, श्रीशैल कंटोळी, अमोल तावरे, सागर गाडेकर, गणेश होळकर, चेतन कुंभार, महिला पोलिस निर्मला उप्पू, केतकी सपकाळ, अर्चना मोरे, होमगार्ड सुरेश शिंदे यांचा या पथकात समावेश होता.