कादिवली येथे आगीत घर जळून खाक

दोन कुटुंबांचे १३ लाखाचे नुकसान ; शॉर्टसर्किटचा अंदाज

दापोली:- तालुक्यातील कादिवली हनुमाननगर येथील सुनील भागोजी कासार यांच्या घराला आग लागली. या घरात राहणाऱ्या सुवर्णा काते यांचे व कासार या दोघांचे मिळून १३ लाखाचे नुकसान झाले आहे.

रविवारी (ता. २) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लागलेल्या आगीत घर भस्मसात झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागली तेव्हा घरामध्ये सुवर्णा काते एकट्याच होत्या. त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना जागे केले; मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे सर्वांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे घरातील सामान खाक झाले. कासार हे कुटुंबासह मुंबई येथे लग्नाला गेले होते. काते यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे त्या गृहोपयोगी सामानासह कासार यांच्या घरी राहात होत्या.
आगीची झळ शेजारील घरांनाही बसली. त्या घरांच्या खिडक्यांच्या काचा तडकल्या तसेच आजूबाजूस असणाऱ्या घरांच्या पन्हाळीदेखील आगीत वितळल्या. याची खबर सरपंच प्रमोद माने यांनी महसूल विभागाला दिली. महसूल विभागाकडून सोमवारी दुपारनंतर पंचनामा करण्यात आला. आग आटोक्यात आणण्यासाठी उपसरपंच अनंत काते, मधुकर महाडीक, सदानंद महाडीक, गजानन दर्गे, महेंद्र खेडेकर, अशोक कासार, गणपत महाडीक आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

चौकट
लग्नात मिळालेल्या वस्तू, दागिने खाक
सुनील कासार यांच्या मुलीचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. मुलीच्या लग्नात मिळालेले कपाट, दागदागिने व इतर वस्तू या आगीमध्ये खाक झाल्या तसेच काते यांचे गृहोपयोगी साहित्यही आगीत जळून खाक झाले.