रत्नागिरी:- काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येत्या 16 मार्च रोजी रत्नागिरीच्या दौर्यावर असून यावेळी ते काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. याची माहिती काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात विशेषतः कोकणात काँग्रेस पक्षाची सर्वाधिक पडझड झाली आहे. ही पडझड रोखण्यासाठी आणि पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येणार आहेत. या दौर्याचा आढावा घेण्यासाठी प्रदेश स्तरावर वरिष्ठ पदाधिकारी रत्नागिरीत आले होते. यावेळी माजी आमदार हुस्नबानु खलिफे, रमेश कीर, अशोकराव जाधव, दीपक राऊत, बाळा मयेकर, भाई सावंत, अॅड. अश्विनी आगाशे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणेश पाटील पुढे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राज्यभर दौर्याचे नियोजनाबाबत चर्चा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, जे जिल्हे संघटनात्मक अडचणीत आहेत, अशा ठिकाणी मेळावे व्हावेत त्यानुसार पहिलाच दौरा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा जाहीर झाला आहे.
16 मार्च रोजी हर्षवर्धन सपकाळ हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौर्यावर येणार आहेत. येत्या 2 दिवसांत दौर्याची रूपरेषा जाहीर होणार असून या दौर्यात ते प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.