कर्जदारांचे पैसे वापरत मणिपाल कंपनीची पावणेदोन लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- टू व्हिलर कर्जदारांकडून कागदपत्रे गोळा करताना त्यांच्याकडून परस्पर रकमा स्वीकारत स्वतःच्या फायद्यासाठी वापरून मणिपाल कंपनीची पावणेदोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर २०२२ ते १४ डिसेंबर २०२२ या कालावधीत घडली असून, संशयितावर मणिपाल कंपनीतर्फे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश संदीप कदम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात नवनीत एडवीन वॉलटर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, यातील संशयित यश कदम हा रत्नागिरीतील सुभाष रोड येथील आय.सी.आय.सी.आय. बँकेत मणिपाल बिजनेस सोल्युशन प्रा. लि. मध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याच्यावर विश्वासाने टू व्हिलर कर्जदारांची कागदपत्रे गोळा करायचे काम सोपण्यात आले होते. परंतु, त्याने मणिपाल बिझनेस कंपनीची कोणतीही परवानगी न घेता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी कर्जदारांकडून रकमा स्वीकारून आपल्या खात्यात जमा केली. याद्वारे कंपनीची १ लाख ८५ हजार ६६२ रुपयांची फसवणूक केली.