रत्नागिरी:- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी एसटी महामंडळाने करार पद्धतीने राज्यात ८०० चालक-वाहकांची नियुक्ती केली होती. यामध्ये जिल्ह्यातील ५२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासनाने २ तारखेला हा करार संपुष्टात आणला. जादा चालक, वाहकांची गरज नसल्याने पुन्हा करार केला जाणार नसल्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांच्या व महामंडळाच्या गरजेच्या वेळी धाऊन आलेल्या ५२ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. महामंडळाच्या तिजोरीतही खडखडाट असल्याने आगामी दसरा-दिवाळीच्या सणासुदीला कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणार की फरफट याकडे लक्ष आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जवळपास ५ महिने संप केला होता. एसटीचा हा ऐतिहासिक संप ठरला. त्यानंतर तत्कालीन सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. ठाकरे सरकारने विलिनीकरणाची मागणी वगळता बाकी मागण्या मान्य करत एसटी कर्मचाऱ्यांची भरघोस वेतनवाढ दिली होती. तसेच नियमित वेतन व महामंडळाला आर्थिक मदतीची घोषणा देखील केली होती. न्यायालयाने यात हस्तक्षेप करून संपकऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कर्मचारी कामावर हजर होऊन एसटी पुन्हा सुरू झाली. आता शिंदे सरकारच्या काळात पुन्हा वेतनाचा प्रश्न निर्माण होण्याचे शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी एसटी महामंडळाने करार पद्धतीने ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. ते करार देखील २ तारखेला संपवले गेले आहेत. आता ज्यादा चालक, वाहक यांची गरज नसल्याने पुन्हा करार केला जाणार नसल्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या व महामंडळाच्या गरजेच्या वेळी धाऊन आलेल्या जिल्ह्यातील ५२ कर्मचाऱ्यांसह राज्यातील ८०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. दरम्यान या ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नयेत, अशी मागणी काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.