आ. लाड यांच्याकडून परटवणे येथे अनधिकृत बांधकाम

रत्नागिरी:- परटवणे, खालचा फगरवठार येथे खरेदी केलेल्या जमिनीत अनधिकृत बांधकाम करून नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार फगरवठारवासियांनी केली आहे. हे अतिक्रमण भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केले असून पिढ्यानपिढ्या वापरात असलेली विहीर ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

परटवणे खालचा फगरवठार येथे आमदार प्रसाद लाड यांनी जमिन खरेदी केली आहे. त्याठिकाणी अलिशान बंगला बांधण्याचे काम सुरू आहे. तत्पुर्वी अवाढव्य कम्पाऊंड वॉल बांधण्यात आली आहे. ज्या कंंम्पाऊंड वॉलची उंची नियमाप्रमाणे 5 फूट हवी ती सुमारे 9 ते 11 फूट बांधण्यात आल्याची तक्रार फगरवठारातील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच कंम्पाऊंड वॉल बांधण्यासाठी नगरपरिषदेची कोणतीही परवानगी घेतली नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जोपर्यंत जागामालक रस्त्याची जागा व विहिरीचा ताबा नगरपरिषदेला देत नाहीत तोपर्यंत घर बांधकाम व कंम्पाऊंड वॉलची बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी तक्रार अर्जातून केली आहे. 

ही विहीर 100 वर्षे जुनी असून या विहिरीचा सार्वजनिक वापर होत होता. आज ती विहीरदेखील कंम्पाऊंडच्या आत घेऊन येथील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचे काम जमिनमालक आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी तक्रार अर्जात केला आहे. यापुर्वी आजुबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ पाणीटंचाईच्या काळात या विहिरीवर पाणी नेण्यासाठी येतात. 400 ते 500 लोकं या पाण्यावर अवलंबून होती. नगरपरिषदेने ही विहिर आरक्षित करून येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. या विहिरीच्या दुरुस्तीचा खर्च वर्षानुवर्षे येथील ग्रामस्थांनी केला आहे, असे देखील तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. 

या तक्रार अर्जाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, उपनगराध्यक्ष रोशन फाळके, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना पाठविण्यात आली आहे. यावर नगरपरिषदेने वेळीच कारवाई न केल्यास येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून लढा देतील, असा इशाराच खालचा फगरवठार येथील ग्रामस्थांनी दिला आहे.