आगरनरळ येथे वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची सुटका


रत्नागिरीः– तालुक्यातील आगरनरळ येथे वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुटका केली. बुधवारी सकाळी ही घटना उघड झाली होती.

भक्षाच्या शोधात असताना बिबट्या आगरनरळ येथे राहणार्‍या वासुदेव गोताड यांच्या शेतात लावलेल्या वायररोपमध्ये रात्रीच्या सुमारास अडकला.गावातील ग्रमस्थ सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ग्रामस्थांनी याची माहिती पोलीसपाटलांना दिल्यानंतर त्यांनी जयगड पोलीसांनी या घटनेची माहिती दिली.

जयगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांना माहिती दिली. त्यांनी आपल्या सहकार्यांसह पिंजरा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या वायररोपमध्ये अडकल्याने कटरच्या सहाय्याने वायररोप कापून बिबट्याची सुटका करण्यात आली. सुमारे सात वर्षाचा बिबट्या असून त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

बिबट्याची सुखरूप सुटका करण्यासाठी विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी प्रियंका पंढरीनाथ लगड, वनपाल संगमेश्वर सु.आ. उपरे, म.ग.पाटील, सा.रं.पताडे, वनरक्षक कोले, वि.द.कुंभार, न्हा.सि.गावडे, राहुल गुंठे,  सं.म.रणधीर यांनी कार्यवाही पार पाडली.