शुक्रवारी दुपारची घटना; चार तासांनी आग आटोक्यात
संगमेश्वर:- तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण वणवा लागला. मानसकोंड येथील एका गोठ्याच्या जवळ हा वणवा पोहचला. परंतु आंबेड गावचे सरपंच सुहास मायंगडे व ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखविल्याने आग नियंत्रणात आणून गोठ्याचे संरक्षण केले. भर दुपारी वणवा लागल्याने आगीने मोठा परिसर गिळंकृत केला. स्थानिकांनी वणवा आटोक्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र देवरूख नगरपंचायतीच्या अग्नीशमन बंब आल्यानतंर सुमारे चार तासांनी आग आटोक्यात आली.
आग पुढे सरकत आंबेडच्या दिशेने जात होती. याची कल्पना उपसरपंच शोएब भाटकर यांना देण्यात आली. शोएब भाटकर यांनी त्वरित सलाउद्दीन बोट, कासम भाटकर, आयुब शिरगावकर, हशमत शिरगावकर, हसीना शिरगावकर, मुनीरा बोट, निसार केळकर, असगर भाटकर, नाजीम आंबेडकर या ग्रामस्थांना सोबत घेऊन लागलेला वणव्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. कोणी बादली, मग, घमेले, ड्रम, हंडा, कळशी हातात मिळेल ते साहित्यात पाणी घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
भर दुपारी आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. शेवटी उपसरपंच शोएब भाटकर यांनी म्हात्रे कंपनीला विनंती करून त्वरित पाण्याचा टँकर मागवला. याची कल्पना तलाठी जाधव यांना मिळताच त्यांनी देवरुख तहसीलदार यांना माहिती दिली आणि देवरुख येथून अग्निशामक दलाची गाडी मागवली. याचवेळी आंबेड इथे शिमगोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. ग्रामस्थ शिमगोत्सवात व्यस्त होते. मात्र काही सुजाण ग्रामस्थांना वणव्याची माहिती मिळताच त्यांनीही धाव घेतली. यावेळी संगमेश्वर पोलिस बीट अंमलदार शेलार आणि पोलिस पाटील फेपडे हे देखील हजर झाले. सर्व यंत्रणांनी त्वरित दखल घेतल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य झाले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. ही लागलेली भीषण आग सायंकाळी पाच वाजता आटोक्यात आली.