रत्नागिरी:- जयगड-निवळी रस्त्यावरील तिवराट चेकपोस्ट येथील वळणावर बेदरकारपणे रिक्षा चालवून दुचाकीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी दुचाकीस्वाराच्या दुखापतीस तसेच दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षा चालकावर रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना मंगळवारी सायंकाळी 7.54 वा.सुमारास घडली.
मंगेश विठ्ठल मोहिते (48,रा.टिके,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.मंगळवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-के-4111) घेउन जयगड ते निवळी असा जात होता.त्याचवेळी सुरेंद्र शिवराम जाधव (53,रा.करबुडे,रत्नागिरी)हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-04-जेएस-3374) घेउन निवळी ते जयगड असे येत होते.ही दोन्ही वाहने चेकपोस्ट समोरील उतारात आली असता मंगेशचा रिक्षावरील ताबा सूटला आणि त्याने जाधव यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला.यात जाधव यांना दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल जोशी करत आहेत.