रत्नागिरी:- घाटमाथ्यावरील जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा भाजीपाल्यांला चांगलाच फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात भाजीपाला विक्रीसाठी येतो. पण पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. ग्रामीण भागात भातशेती सुरू असल्याने तेथूनही भाजी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी भाज्यांचे दर वाढले आहेत.
कोकणात सध्या बहुतांश भाज्यांचे दर शंभरी पार झाले आहेत. यात घेवडा, गाजर, फरसबी, हिरवी मिरची, मटार, भेंडी या भाज्यांनी किलोचा शंभरी दर पार केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अनेकांना पालेभाज्या खाण्याकडे देखील दुर्लक्ष केले आहे. मागील काही दिवसांत सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे रानभाज्यांची चांगल्या प्रकारे आवक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याला पसंती द्यायला सुरुवात केली आहे. तसेच रानभाजी शरिरासाठीही उत्तम असल्याने नागरिकांचा दिवसेंदिवस रानभाज्यांकडे कल वाढत आहे.
मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे धान्य, फळभाज्या आणि पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे रोजच्या तुलनेत बाजारात आवक घटली आहे. बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दरही वाढले आहेत.