मुख्यमंत्र्यांचा १० डिसेंबरचा दौरा आठवडाभर पुढे

सीमावाद चिघळल्याचा परिणाम 

रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा १० डिसेंबरला होणार रत्नागिरी दौरा अनिश्चित आहे. त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे तो पुढे ढकलला जाणार असून १६ डिसेंबरला हा दौरा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्यात रत्नागिरीतील विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. या दौर्‍यात शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सभा होणार असून तारांगणाचे उद्घाटन, लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे भूमिपूजन आणि शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.  

शिवसेनेत उभी फुट पाडून एकनाथ शिंदे यांनी सेनेला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीबरोबर सत्तेत असताना हे राजकीय नाट्य घडले. त्यामुळे सरकारला पायउतर होणे भाग पाडले. एकनाथ शिंदें यांनी केलेल्या या बंडाने महाराष्ट्र नव्हे, तर देशात चर्चा झाली. अखेर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना मिळून युतीची सत्ता राज्यात आली. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातून शिंदे गटामध्ये उदय सामंत, योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिक दाखल झाले. शिंदे गटाला अजून उभारी मिळावी, यासाठी शिंदे गटाचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. रत्नागिरीचे आमदार तथा विद्यमान पालकमंत्री उदय सामंत आणि खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्य शिलेदार आहेत. काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री खेडमध्ये खासगी दौर्‍यावर येऊन गेले होते. तत्पुर्वी कोकणातील येथील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ते येथील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांचा दौरा झाला नाही. डिसेंबर महिन्यात त्यांचा दौरा होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

नुकताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी पालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सुचनाही दिल्या. यावेळी १० डिसेंबरला  मुख्यमंत्री रत्नागिरीत येण्याची शक्यता असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. ते प्रथमच रत्नागिरी दौर्‍यावर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तयारी सुरु करा, अशा सूचनाही दिल्या. या दौर्‍यात शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सभा आयोजित करण्यात येणार असून माळनाका येथील तारांगणाचे उद्घाटन, लोकमान्य टिळक  ग्रंथालयाचे भूमिपूजन आणि शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. परंतु १० डिसेंबरचा हा दौरा अनिश्चित असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांचे वेळापत्रक व्यस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळल्याने आणि तोंडावर हिवाळी अधिवेशन असल्याने हा दौरा पुढे जाण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा रत्नागिरी दौरा होण्याची शक्यता आहे.