मालगुंड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाचे संवर्धन

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड किनारी यंदापासून ऑलिव्ह रिडले कासवाचे संवर्धन वन विभागाच्या मॅग्रुव्हज फाऊंडेशनच्या पुढाकाराने चालु आहे. येथील कासवमित्र ॠषिराज जोशी हे संवर्धनाचे काम करत असून ११ हॅचरी किनार्‍या झाल्या आहेत. आतापर्यंत २५१ कासवांचे संवर्धन करण्यात यश आले आहे. तिव्र उन्हामुळे वाळूचा पृष्ठभाग कडक झाल्याने पिल्लं आतमध्येच अडकण्याची भिती होती; मात्र ॠषिराज यांनी लक्ष ठेवल्यामुळे काही पिल्लांना जीवनदान मिळाले.

कोकणातील विविध किनार्‍यांवर विणीच्या हंगामात अनेक ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यासाठी येतात. तालुक्यातील मालगुंड येथील गायवाडी किनार्‍यावर १६ फेब्रुवारी २०२२ ला ऑलिव्ह रिडलेचे पहिले घरटे आहे. हा किनारा विस्तीर्ण आणि शांत असल्यामुळे अनेक कासवं अंडी घालण्यासाठी येऊ लागली. पुर्वीही येथे कासवे अंडी घालून येऊन जात होती; परंतु त्यांची अंडी वन्यप्राण्याकडून नष्ट केली जात होती. याबाबतची माहिती वन विभागाला प्राप्त झाल्यानंतर कासव संवर्धनासाठी मालगुंड येथील सर्पमित्र ॠषीराज जोशी यांना विचारणा करण्यात आली. ॠषीराजनेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत काम सुरु केले. मालगुंड येथील किनार्‍यावर समुद्राचे पाणी येणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी हॅचरी करण्यात आली आहे. आतापर्यंत ११ हॅचरी केल्या असून त्यामध्ये सुमारे १ हजार ५२ अंडी आहेत. आतापर्यंत त्यातील २५१ पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात झेपावली आहेत. ॠषीराज यांच्या अंदाजानुसार ६० टक्के पिल्ले सुरक्षितरित्या अंड्यामधून बाहेर येतील.

पिल्लं अंड्यातून बाहेर पडली की वाळूत खड्डा तयार करतात. त्यामुळे पृष्ठभागाकडील बाजू थोडीशी आतील बाजूस दबली जाते. वाळूवर पाऊस पडल्यामुळे किंवा अधिक दव पडला की वाळू कडक होते. यंदा अवकाळी पावसामुळे हा प्रकार घडल्याचे निरीक्षणही कासवमित्रांनी मालगुंड येथे नोंदवले आहे. हॅचरी केलेल्या वाळूत झालेले बदल लक्षात आल्यानंतर त्यावर परडी टाकून ठेवली जाते. पुढे दोन दिवसात पिल्ले बाहेर पडतात. परडी असल्यामुळे पिल्ले एकाच ठिकाणी राहतात. परिणामी त्यांना समुद्रात सुरक्षितरित्या सोडणेही शक्य होते. ऑलीव्ह रिडले कासवं आढळून आल्यामुळे मालगुंड किनारा कासव संवर्धनासाठी वन विभागाकडे नोंदला गेला आहे.