खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अथर्व मोहन सावंत (वय २५ वर्षे, रा. पेढांबे, ता.चिपळूण जि. रत्नागिरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना धामणदेवी गाव हद्दीत मंगळवारी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गवरील धामणदेवी गावच्या हद्दीत कशेडी घाटामध्ये आज सकाळी तळोजा ते लोटे जाणारा ट्रक (क्रमांक MH-04-DK-7258) वरील चालकाने ओव्हरटेक करताना मुंबईकडे जाणारी दुचाकी (क्रमांक MH-08-AV-3726) जोरदार धडक दिली. यामध्ये अथर्व सावंत जागीच ठार झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी पोलीस कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्गाचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी ही पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी घेतली. पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण केले आहे. यावेळी जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका तसेच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष श्री. प्रसाद गांधी, नवनाथ घोलप यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.
पोलीस मित्र मुकुंद मोरे, समाज सेवक सनी जाधव, विघ्नेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना मदत कार्य केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दुचाकीचा चक्काचूर
दुचाकी ट्रकच्या पुढील भागात पूर्णपणे अडकलेली होती. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.