रत्नागिरी:- मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही अशी भुमिका शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तर एकनाथ शिंदे यांची भुमिका पक्षाने समजून घेतली पाहीजे, लोकांमधील गैरसमज दूर करायला हवेत. यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
मुंबईहून पाली येथील निवासस्थानी आल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सामंत यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या काही प्रमुख पदाधिकार्यांशीही चर्चा केली होती. ते म्हणाले, मी गुवाहाटीला गेलो असे वृत्त आले होते, पण आता मी रत्नागिरीतील पाली येथील घरी आहे. मी शिवसेनेतच आहे. गुवाहटीला असलेले सर्व आमदार बाळसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे आमदार आहेत. त्यांनी गट केला म्हणजे त्यांचे मत बदलले असे होत नाही. त्यांच्या वैयक्तिक गोष्टी समजून घेतल्या पाहीजते आणि सर्वांनी एकत्र आले पाहीजे. भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे, त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहीजे. वेगळ्या गटासंदर्भातील गोष्टींची कायदेशीर तपासणी करण्याची गरज आहे. मी मंत्री असताना माझी कामे होती होती. अन्य आमदारांचा अनुभव काय हे बोलणे योग्य नाही. विकासासाठी पक्षाने जबाबदारी दिली आहे. त्याचं सोनं करणारे आम्ही कोकणातील आमदार आहोत. त्यामुळे संजय शिरसाट यांनी विरोधी वक्तव्य केले म्हणून त्यावर वक्तव्य करणे योग्य नाही. मी पक्ष जोडणारा असून तोडणारा नाही. सर्वजणांना जोडावे यासाठी माझा कल आहे.
याप्रसंगी सामंत म्हणाले की, शिवसेनेच्या प्रतोदानी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदानी काढलेली नोटीस त्यात तांत्रिक बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरेल. पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे आणि कायदेशीर लढाईला आम्हाला सामोरं गेले पाहिजे. एकनाथ शिंदे यांची सुरवातीपासूनच नेमकी भूमिका काय आहे हे काय पक्षाला कळली नाही, किंवा पक्षप्रमुखांना समजली नाही. ती भूमिका मांडणे आवश्यक आहे. या घडामोडींविषयी माझी भूमिका शिवसेनेचे नेत सुभाष देसाई, विनायक राऊत यांच्यापुढे बैठकीमध्ये मांडली आहे. पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर कुठंतरी सगळ्यांना विश्वासात घेतले पाहीजे. जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर करायला हवेत. या सगळ्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. शिवसेना पक्ष डॅमेज होणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली गेली पाहिजे.